मुलांची गृहभेट एक अविस्मरणीय अनुभव.....

नमस्कार !  भटकंतीची पाठशाळा या लेखमालेला केवळ भारतातूनच नाही तर जगभरातून मराठी वाचक उदंड प्रतिसाद देत आहेत. अनेक नवीन वाचकांनी मी कोण, काय करते असे प्रश्न विचारलेत. लेखाच्या खाली मी आमच्या संस्थेच्या website ची लिंक दिली आहे. ती पाहिल्यावर संस्थेच्या कामाचा अंदाज येईल. आमच्या कडे मागच्या वर्षी कविता नावाची एक मैत्रिण शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी आली होती.  आमच्या वसतिगहात राहणाऱ्या काही मुलांच्या घरी ती जाऊन आली. त्यांचं आयुष्य तिने अनुभवलं आणि शब्दबद्ध केलं. तिचं लिखाण मला भावलं. म्हणून ते आपणा सर्वांबरोबर share करत आहे.

आमच्या कडे वसतिगृहात मुलं कुठून येतात आणि त्यांची आर्थिक  स्थिती कशी आहे याचा अंदाज येईल. केवळ  वसतिगृहातीलच नाहीत तर आपल्या तिन्ही शाळातील सर्वच मुले आपल्या कडे निःशुल्क शिकतात. ही सर्व मुले गरीबी रेषे खालील कुटुंबातील आहेत. अत्यंत दुर्गम अशा अलिराजपुर, बडवानी, खरगोन या जिल्ह्यातील आहेत.

पुढचे तीनचार  दिवस जरा इतर कामांमध्ये व्यस्त असेन म्हणून  भटकंतीची पाठशाळाचा लेख पाठवता येणार नाहीत. तिने काढलेले काही फोटो देखील share करत आहे.

 मुलांची गृहभेट एक अविस्मरणीय अनुभव.....


मध्यप्रदेश-खरगोन जिल्हा-कसरावत तालुका-लेपा नावाचे छोटेसे गाव.....काय विशेष आहे येथे ? मूळच्या नाशिकच्या भारती ठाकूर ताईंनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्यावर याच गावात नर्मदातीरावरील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी 10 वर्षांपूर्वी प्रयत्न सुरू केले. "नर्मदालय" या नावाने आज ही संस्था नावारूपाला आली आहे. संस्थेच्या अनेक कामांपैकी शाळा व छात्रावास हे दोन स्तुत्य उपक्रम. अतिशय दुर्गम भागातील मुले येथे राहून शिक्षण घेत आहेत.

तर अश्या ह्या रामकृष्ण शारदा निकेतन शाळेची वार्षिक परीक्षा संपून उन्हाळ्याची सुट्टी लागण्याचे दिवस जसजसे जवळ येत होते तसतसे छात्रावासातील वातावरण हळूहळू बदलत होते. शेवटचे दोन दिवस तर सगळीकडे वेगळाच उत्साह होता. हा उत्साह होता घरी जाण्याचा. प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर तो अगदी सहज दिसत होता. गप्पांमध्ये देखील हाच विषय होता. होळी, रंगपंचमी, त्यानिमित्ताने प्रत्येक गावागावात बाजाराच्या ठिकाणी लागणारे भगोरिया (जत्रा) याबाबत मुले भरभरून सांगत होती. घरी गेल्यावर आम्ही कुठेकुठे भगोरियासाठी जाणार याचे मनसुबे सांगितले जात होते. 'अलिराजपूर' या मध्यप्रदेशातील सर्वात मागास गणल्या जाणाऱ्या जिल्यातील आदिवासी समाजाचा 'भगोरिया' हा एक अत्यंत महत्वाचा सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम. यावेळी आपण आदिवासी संस्कृती, नृत्य, वाद्य, पेहेराव, दागदागिने, खान-पान अश्या अनेक गोष्टी अनुभवू शकतो. त्यामुळे साहजिकच मुलांमध्ये सळसळता उत्साह होता.14 मार्च ची रात्र तर खूपच मजेशीर होती. मुलांना झोपच नव्हती. प्रत्येक जण आपल्या पेटीजवळ बसून काहीतरी करत होता. आमची व मुलांची नजरानजर झाली की त्यांना गालातल्या गालात खुदुखुदु हसू येत होते. जातायेता त्यांना विचारले की,"अरे झोपायचे नाही का आज ?" की एकच उत्तर, "दीदी पेटी जमा रहें हे।" त्यांची ती लगबग बघून मला तर खूपच मजा वाटत होती. नेहमी घरीच राहून शिकलेल्या मला या भावनेचे भलतेच अप्रूप वाटले.



आपल्याला ही जाता आले तर यांच्या बरोबर !! हा विचार मनात आला आणि एक वेगळाच आनंद झाला. भारती ताईंशी बोलून त्यातल्यात्यात जवळच्या गावाला मुलांच्या घरी दोन दिवस जायचे निश्चित झाले. मी झिरन्याला जाणार म्हणून आणि झिरन्याची मुले दीदी आपल्या घरी येणार म्हणून खुश एकदम !!

15 मार्च चा सकाळचा 9 ते 12 चा पेपर संपवून जसजशी मुले शाळेतून छात्रावासात येऊ लागली तसतसे त्यांच्या मागोमाग त्यांचे वडील पालक देखील येऊन पोहोचले. मग काय.... एकच आनंद, एकच उत्साह.... मुलांना तर जेवणही सुचत नव्हते. शेवटी सगळ्यांची जेवणे आटोपली आणि मंडळी निघाली घरी जायला. झिरन्याच्या वडील पालकांना भारती ताईंनी मी त्यांच्या बरोबर 2 दिवस त्यांच्या घरी येणार असल्याचे सांगितले आणि एकदम "कहानी में Twist आ गया।" झिरन्याचे सगळे पालक आपापल्या मुलांना घेऊन जाण्यासाठी मोटारसायकल वर आले होते. आता आली का पंचाईत ... मी कशी जाणार ? लगेचच भारती ताईंनी समोरच उभ्या असलेल्या जलसिंधी च्या एका पालकांना मी त्यांच्या बरोबर येऊ शकते का ? याबाबत विचारले आणि माझी रवानगी जलसिंधी च्या गाडीत (ट्रॅक्स) झाली. मला काय झिरन्या ऐवजी जलसिंधी.... काहीच माहिती नसल्याने फरक पडतच नव्हता. फक्त एवढेच समजले होते की आधी 2/3 तासांचा प्रवास होता आता तो 6/7 तासांचा आहे. आपण बरेच दूरच्या आणि त्यामुळेच दुर्गम भागात जाणार आहोत एवढेच काय ते लक्षात आले.



चला निघायची वेळ झाली.आत्तापर्यंत गाडीत बसलेल्या मुलांपर्यंत व इतर पालकांपर्यंत मी येत असल्याचा निरोप वाऱ्याच्या वेगाने पोहोचला होताच. मी गाडी जवळ पोहोचले तर दिदीसाठी पुढची सीट मोकळी करून ठेवली होती. मला खूपच कौतुक वाटले. मागे एकूण 11 मुले व 6/7 पालक adjust करून बसले होते. प्रवास सुरू झाला आणि मी सहज विचारले, सगळ्यांना नीट बसता येतंय ना ? अडचण तर नाही ना होत ? क्षणाचाही विलंब न लावता ड्रायव्हर म्हणाले, "आप चिंता मत करो इस गाडी में तो 30/35 लोग बैठकर जाते हे।" सोइ-सुविधांची कमतरता असली की माणूस किती adjustable होतो नाही. आमच्या या प्रवासात हळूहळू खरगोन, धार जिल्हे मागे पडले आणि आम्ही अलीराजपूर जिल्ह्यात प्रवेश केला. मुलांनी एकदम उत्साहात सांगितले, "दीदी हमारा जिल्हा आ गया।" यालाच तर Belongingness म्हणतात ना !! आत्तापर्यंत फोनाफोनी करून एक दीदी घरी येत आहे हा निरोप काही जणांनी घरी सांगितला होता. आम्ही सपाटीचा प्रदेश सोडून आता पूर्णपणे डोंगराळ भागात आलो होतो. सर्व दूर लहानमोठ्या टेकड्याच टेकड्या दिसत होत्या. मला आपले वाटले की पोहोचलो आता. पण मला कुठे कल्पना होती, जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला जायचे आहे. साधारण दुपारी 1 वाजता निघालेलो आम्ही सगळे संध्याकाळी 6.30 वाजता खेरवाडा या गावी पोहोचलो. सगळे गाडीतून उतरले आणि मला समजले की गाडी इथपर्यंतच आहे. आज मला याच गावात रहायचे आहे. जलसिंधी ची मुले आता पुढचा प्रवास मोटरसायकल वरून करणार आहेत. "दीदी आज देर हो जायेगी, आपको कल लेने आएंगे।" असे सांगून सगळे निघाले.

आम्ही देवानंद नावाच्या एका मुलाच्या घरी मुक्कामास गेलो. देवानंदच्या आजोबांनी हसून स्वागत केले.


इतके टापटीप, स्वच्छ घर होते म्हणून सांगू. एका छोट्या टेकडीवर असलेले हे प्रशस्त घर चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले होते. घरात शिरतानाच समोर सुंदर सूर्यास्त दिसला, अगदी चित्रातल्या सारखा. घरात जेवणाची लगबग सुरू होती. फोन ची कृपा. काहीतरी स्पेशल बेत आहे एवढेच जाणवत होते. देवानंदची आजी माझ्याशी गप्पा मारत होती, त्या आदिवासी भाषेत आणि मी हिंदीत...... काही अडले नाही आमचे. फोनला रेंज फक्त मागच्या दारी येते असे समजले म्हणून मी मागे गेले तर मागे छान निखारे बनवण्याचे काम सुरू होते. एका मोठ्या सुपात रुईच्या दोन पानांमध्ये काहीतरी घालून ठेवले होते. पुढची प्रक्रिया बघण्यासाठी मी तिथेच थांबले. मग देवानंद, अमरत व राजू च्या वडीलांनी मिळून ती पाने निखाऱ्यांवर शेकायला ठेवली. त्याच्या आत मक्याच्या पिठाच्या छोट्या छोट्या जाड भाकऱ्या होत्या. निखाऱ्यांवर पानांमध्ये भाजून झाल्यावर त्यांनी पाने काढून टाकली व पुन्हा बराच वेळ शेकले. जेवताना आम्ही "दाल पानीया" हा चविष्ट पदार्थ खाल्ला. एकमेकांच्या घरी जाऊन एकमेकांना मदत करणे, हक्काने जेवणे ही शहरात बघायला न मिळणारी आपुलकीची संस्कृती इथे अजूनही आहे. एकोपा जपत जगणे किती आनंददाई असते ना !!



दुसऱ्या दिवशी आम्ही राजू, हर्देश, अमरत यांच्या घरी गेलो. माणसाच्या खरतर किती कमी गरजा असतात आणि आपण त्या किती वाढवून ठेवल्या आहेत याचा पदोपदी अनुभव मिळत होता. सगळ्यांचीच कच्ची घरे होती. कोणाची नुसत्या विटा रचून उभारलेली तर कोणाची काड्यांना माती लिंपून केलेली. घरात माणसांबरोबरच शेळ्या, कोंबड्या, गाई यांना ही हक्काचे स्थान होते. 3/4 बाजा (विणलेल्या खाटा), थोडे अंथरूण-पांघरूण, 2/3 पेट्या, 5/6 भांडी, 3/4 कळश्या, एका बांबूवर नीट घडी करून ठेवलेले कपडे, मीठ-तेल-मसाल्याच्या 4/5 पुड्या किंवा बरण्या आणि बाकी थोडी धांन्याची पोती बास इतकाच काय तो संसार.... नेमक्या गरजा भागवणारा, आनंदी व समाधानी.... सगळ्यांनी आम्हाला कणीस, मुंगफली, पापड भाजून आग्रहाने खाऊ घातले. स्वतःच्या कुटुंबाला जेमतेम वर्षभर पुरेल इतकेच धान्य (डाळी,मका,ज्वारी) साधारण बरेच जणांच्या शेतात पिकते.बरेचदा रात्री फक्त मक्याची पेज असते जेवणात.त्यामुळेच आहे त्यावर आदरातिथ्य होत होते.



मुलांच्या घरी जाऊन होते ना होते तोवरच अर्जुन व त्याचे वडील आम्हाला घेऊन जायला आले. "दीदी आपको घुमा लाएंगे।" असे म्हणून त्यांनी आम्हाला एका डोंगरावरच्या छोट्याश्या देवीच्या मंदिरात नेले. जाताना देवानंदच्या घरी सांगून जायला पाहिजे ही माझी आपली शहरी पद्धत, त्यावर ते म्हणाले, "दीदी उन्हे समज जायेगा।" आपण जेव्हा इतक्या अनोळखी व दुर्गम भागात जातो तेव्हा तिथल्या माणसांवर सगळ्या गोष्टी सोपवून आपण निवांत रहायचे आणि जसे घडते तसे स्वीकारायचे, आपला शहरी शहाणपणा जरा बाजूलाच ठेवायचा, हे तत्व मला खूप उपयोगी पडले. आणि त्यामुळेच मी 3 दिवस मजेत घालवू शकले. देवळातून खाली आल्यावर मला समजले की आमच्या बरोबर जे आणखीन एक गृहस्थ आहेत ते महेशचे वडील आहेत आणि ते आम्हाला जलसिंधीला घेऊन जाण्यासाठी आले आहेत. सकाळी शेजारच्या मुलांच्या घरी जाऊन येतो, असे सांगून निघालेलो आम्ही आता असेच पुढे जलसिंधीला जायला निघालो. निम्मा रस्ता आपण पार केलेला आहे हे समजल्यावर आमची कपड्याची बॅग बरोबर घेतलेली नाही, हे म्हणण्यासाठी माझी जीभ रेटली नाही. एका दिवसाचाच तर प्रश्न आहे, आपण करूया adjust असे मी स्वतःला सांगितले.



डांबरी रस्ता संपेपर्यंत अर्जुनचे वडील त्यांच्या गाडीतून आम्हाला सोडवण्यासाठी आले. त्यानंतर आमची रवानगी मोटरसायकलवर झाली. कारण येथुनपुढे रस्ता संपलेला होता. आता होती ती फक्त डोंगर फोडून बनवलेली वाट......चढउतारांची, वळणावळणाची आणि खूपसाऱ्या दगडगोट्यांची.... 2 तास "जीव मुठीत धरून बसणे" याचा शब्दशः अनुभव घेत मी प्रवास केला. चालवणाऱ्या माणसाची हिंमत, कसब आणि गाडी बनवणाऱ्या कंपनीला शतशः नमन करत मी कधी डोळे गच्च मिटून तर कधी सभोवतालचा उजाड डोंगराळ प्रदेश बघत प्रवास केला. पण अजून "पिक्चर तो अभी बाकी हे मेरे दोस्त" अशी परिस्थिती होती. एके ठिकाणी गाडी थांबवत महेशचे वडील म्हणाले, "दीदी अभी हमे थोडा पैदल जाना हे, गाडी यहा तकही जायेगी, आगे रास्ता नही हे।" आम्ही मोटारसायकल वरून पायउतार झालो. महेशचे वडील एका तट्ट्याच्या शेडमध्ये गाडी लावून आले आणि आम्ही चालू लागलो. 5/10 पावले चाललो आणि समोर खालच्या बाजूला विस्तीर्ण जलाशय दिसला..... आजूबाजूला एकही घर दिसत नव्हते.... खाली उभी असलेली होडी बघून आता आपल्याला होडीतून प्रवास करायचा आहे हे बुद्धीने मनाला सांगितले. मुरूम मातीच्या त्या घसरणाऱ्या डोंगरावरून आम्ही हळूहळू खाली उतरू लागलो. जवळपास 4 वाजले होते तरी पण रखरखीत ऊन जाणवत होते. चप्पल खूप घसरत होती म्हणून शेवटी काढून हातात घेतली. पण 8/10 पावलेच चालू शकले. खूप चटके बसू लागले म्हणून परत चप्पल घातली. मग सुरू झाला चप्पल काढत-घालत चालण्याचा खेळ..5/7 मिनिटात आम्ही खाली जातो ताई या त्यांच्या वाक्याने आपण जवळजवळ 25 मिनिटे लावली याची जाणीव झाली. आपल्याकडे कितीतरी कौशल्ये नाहीतच याचीही जाणीव झाली. आणि कोणी कोणाला हुशार म्हणायचे असा विचार मनात चमकून गेला .....



खाली पोहोचलो तर महेश होडी घेऊन सज्ज होता. मग सुरू झाला होडीचा प्रवास आणि त्याबरोबरच सरदार सरोवर, डॅम चे पाणी, बुडालेल्या त्यांच्या गावाबाबतच्या गप्पा. जलसिंधी हे मध्यप्रदेशचे शेवटचे गाव. महाराष्ट्र व गुजरात च्या बॉर्डर वरचे, पूर्णपणे डॅमच्या पाण्यात बुडालेले. ताई आम्ही जसजसे पाणी वाढले तसतशी 3 वेळा आमची घरे वरवर चढवली आहेत. काही कारणाने पुनर्वसन न झालेली 14 कुटुंब आजही डोंगराच्या माथ्यावर अतिशय कठीण परिस्थितीत रहात आहेत.(आणि ज्यांचे पुनर्वसन झाले आहे ती लोकं 150 किलोमीटर दूर गुजरातमध्ये रहात आहेत) वीज नाही, खाली विस्तीर्ण जलाशय डोळ्याला दिसत असूनही वरती घरात पाणी नाही, शेती करता येईल अशी सपाट व कसदार जमीन नाही. कमतरता, दुर्गमता, अभाव म्हणजे काय हे साक्षात अनुभवले मी.....अचानक मला आठवले अरे, काल तर या सगळ्यांना इथे पोहोचायला एकदम अंधार झाला असेल. मग कसे आले असतील हे होडीने ?? मी विचारले तर म्हणाले, काल माणसे, सामान खूप होते आणि अंधारपण झाला होता ना मग आम्ही कडेकडेने डोंगरातून चालतच गेलो घरी. या पाण्यात मगरीपण आहेत ना !! मी नि:शब्द..... काय बोलू यावर. किती वेळ लागतो चालत ? आम्ही जातो अर्धा तासात ताई.... आम्हाला 2 तास तरी लागतील माझा मनातला संवाद....साधारण अर्धा तास महेश व त्याच्या काकाच्या मुलाने बखुबी होडी वल्व्हत आम्हाला एका डोंगरापाशी नेले. मग होडीतून उतरून आम्ही पुन्हा चालू लागलो. चालताना वाटेत महेशची आई आणि दोन छोट्या बहिणी भेटल्या. हंडे घेऊन पाणी भरण्यासाठी खाली जात होत्या. नंतर बोलताना समजले की दिवसातून 3 ते 4 खेपा होतात पाण्यासाठी. एकच चांगली गोष्ट म्हणजे घरातील सगळे पाण्यासाठी खेपा घालतात, फक्त आई नाही. शेवटी एक छोटी चढण चढून आम्ही फायनली महेशच्या घरी पोहोचलो.



लाकडाच्या काठयांनी बनवलेले कच्चे घर होते. पावसाळ्यात कसे होत असेल या विचाराने मला भरून आले. अगदी मोजकेच सामान घरात दिसत होते. साठवणूक करणे जणू काही यांच्या संस्कृतीतच नसावे, आजचा दिवस चांगला गेला बास. सोपे, साधे आणि वर्तमानात जगणे.... इथेही आमचे खूप प्रेमाने आदरातिथ्य झाले. प्रथम छोट्याशा वाटी मधून कोरा चहा, मग कणीस, भुईमूगशेंगा भाजून खाल्या. रात्रीच्या जेवणात मक्याची भाकरी,भात आणि उदीड डाळीची घट्ट आमटी असा बेत तर दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या जेवणात डाळबडे होते. रोज असे जेवत असतील का हे ? माझ्या मनात एकदम विचार चमकला आणि खाताखाता घास घशात अडकला. भाज्या तर बहुदा यांना माहीतच नसाव्यात.आणि इतक्या दुर्गम ठिकाणी येणार तरी कुठून म्हणा. शेती तर फक्त पावसाळ्यातच केली जाते ना...... महेशच्या आईने आणि मी वेगवेगळ्या भाषेत (मी हिंदीत व त्या आदिवासी भाषेत) एकमेकींशी खूप गप्पा मारल्या. रात्री अगदी उत्साहात मी बाहेर झोपण्यासाठी तयार झाले, बाजेवर पडल्यावर वरती आकाशही चांदण्यांनी गच्च भरलेले दिसत होते, पण थोड्याच वेळात आमच्या आजूबाजूला गाई वावरू लागल्या. माझ्या आजूबाजुचे लोकं निवांत झोपलेले पण पुर्णपणे शहरात वाढलेल्या मला मात्र गाईंच्या सानिध्यात झोपणे थोडे अवघड गेले.



दुसऱ्या दिवशी जेवण झाल्यावर आम्ही पुन्हा त्याच मार्गाने, त्याच प्रकारे परतीचा प्रवास केला. महेश व त्याच्या काकांचा मुलगा सकाळीच भगोरियासाठी गेले होते. त्यामुळे आम्हाला होडीतून सोडण्यासाठी महेशची 8 वर्षांची छोटी बहीण व 10 वर्षाचा काकांचा मुलगा आले होते. त्या दोघांचे होडी वल्व्हण्याचे कौशल्य बघण्यासारखे होते. आम्हाला सोडून ते दोघे परत होडी घेऊनही जाणार होते. नेमके कशाला शिक्षण म्हणायचे ?? हा प्रश्न नंतर बराच काळ माझ्या डोक्यात घोळत होता... जन्मापासून निसर्गात स्वछंदी जगणारा हा समाज, वयाची 7/8 वर्षे गाईगुरांमागे भटकणारी, जंगलात लाकडे गोळा करायला जाणारी, 150 फूट खोल पाण्यात मनसोक्त पोहणारी, मासेमारी करणारी, स्वावलंबी स्वतःच्या मनाप्रमाणे आयुष्य जगणारी ही मुले....आणि आपण या कश्याकश्याचा गधं नसणारे कृत्रिम शिक्षण त्यांना देऊ पाहतोय....आणि त्यांनी ते लगेचच स्वीकारावे, आपलेसे करावे ही अपेक्षापण करतोय.....आपल्याला त्यांच्या सारखे जगायला सांगितले तर ???? आणि म्हणूनच या सगळ्याचा विचार करून भारती ताईंनी शाळेचे शिक्षण, छात्रावासाची दिनचर्या, मुलांकडून केल्या जाणाऱ्या अपेक्षा, मुलांना इथे मिळणारी ownership ची भावना यासर्व गोष्टींचा सुरेख समतोल साधला आहे. यामुळेच बहुदा मुले घरी जायला जितकी उत्सुक असतात तितकीच परत छात्रालयात यायला उतावीळ असतात.....हीच या कामाची खरी पावती नाही का !!



रात्री देवानंदच्या घरी मुक्काम करून सकाळी आम्ही लेपाला जाण्यासाठी निघालो. येताना मुलांबरोबर गाडीने आलो असलो तरी जाताना मला व आदित्यला बस ने जायचे होते. सकाळी सकाळी साडेसहा वाजता देवानंदच्या वडिलांनी आम्हाला 5 किलोमीटर पुढच्या बखतगड नावाच्या गावी मोटारसायकल वरून सोडले. बखतगड ते कुक्षी, कुक्षी ते खलघाट, खलघाट ते कसरावत आणि कसरावत ते लेपा असा प्रवास करून आम्ही 4 वाजता छात्रालयात पोहोचलो....एक अविस्मरणीय आणि खूप काही शिकवणारा अनुभव गाठीशी बांधून...



कविता, पुणे

Website -
http://narmadalaya.org/

Facebook -
https://www.facebook.com/narmadalaya.ngo

Comments

  1. हे वाचल्यानंतर आमच्या तथाकथित जगण्याला ' समृद्ध ' म्हणायची लाजच वाटेल .
    आता दोन चार दिवस लेख येणार नाहीत हे वाचून हिरमुसलो .

    ReplyDelete
  2. फार वेगळा अनुभव आहे हा. दोन वेळा महेश्वर ला आले पण काही माहिती नव्हते.

    ReplyDelete
  3. नर्मदा पात्र इतक्या जवळ असतानाही सभोवती इतका रुक्ष प्रदेश कसा काय? पूर्वीची जंगलं तोडली गेली आहेत काय? रखरखीतपणा अगदी बोचरा वाटला.
    एका फोटोत लांकडाचे ओंडके एकत्र आणून ठेऊन केलेले गठ्ठे दिसताहेत. तिथल्या निवासी लोकांच्यात या बद्दल जागृती नाही का?

    ReplyDelete
  4. जागतिक महासत्ता बनू पाहणाऱ्या , चंद्रावर जाणाऱ्या इंडिया या दुर्गम भागातील भारतापर्य़त पोहचू शकत नाही नाही दुर्दैव....इंडियापेक्षा हा दुर्गम भारत जवळपास दोन पिढ्या मागे आहे ...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog