गोष्ट एका शाळेची (16)

गोष्ट एका शाळेची (16)



शाळा आणि बांधकाम या दोन वेगळ्या प्रकल्पात दिवस कधी उजाडायचा आणि कधी मावळायचा समजायचं नाही. 
अनेक मुलं रविवारी सुद्धा येऊन बसायची. अनन्या नावाची एक चिमूरडी म्हणायची, “ठाऊक आहे मला शाळेला सुट्टी आहे ते.  तू एकटीच आहेस ना म्हणून आलेय तुला सोबत करायला.” 

रविवारी जरा निवंतपणा असायचा. माझे लांब सडक केस धुवून सुकवणे आणि वेणी घालणे म्हणजे वेळखाऊ काम असायचं. मी वेणी घालायला लागले की अनन्या धावत यायची, “दीदी, मी घालते तुझी  वेणी” असं म्हणत स्वत: खुर्चीवर बसायची आणि मी जमिनीवर. तिच्या इवल्याशा नाजुक हातात माझे केस मावायचे  नाहीत. पण तिचे हात केसांना लागले की मला आईच्या हातांची आठवण यायची. माझ्या लहानपणी दर रविवारी आई अशीच तेल लावून वेणी घालून द्यायची. पाच दहा मिनिटे माझ्या केसांशी खेळून झालं की अनन्या म्हणायची, “खूप मोठे आहेत तुझे केस. नाही जमत मला तुझी वेणी”. 

कुठलाही सण असला की विद्यार्थ्यांच्या घरी हमखास जेवणाचे आमंत्रण असायचे. बिहु सण असला की डबे भरभरून ‘तिल पीठा’ यायचा. पीठा बनवणं हे एक कौशल्य असतं. मला मात्र ते कधी जमलं नाही. पण सरसोंचं तेल वापरुन भाज्या बनवणं आवडायला लागलं. सवय नसली की सुरवातीला त्याचा उग्र वास येतो. 

अशाच एका रविवारी भाजी आणायला बाजारात चालले होते. तीन महिला आणि एक छोटा मुलगा समोरून येत होते. 
तो छोटा मुलगा खूप ओळख असावी असं माझ्याकडे बघून हसला आणि रस्त्यात थांबला. त्याच्या बरोबरच्या त्या तिघी जणी पण थांबल्या.  मलाही थांबणं भाग होतं. 

“ही आमची टीचर आहे. भारती दीदी”. त्या मुलानी माझी ओळख त्याच्या बरोबरच्या महिलांना करून दिली. 

मी अवाक् होऊन पहात राहिले. हा तर आमच्या  शाळेत नाही. मग हा खोटं का बोलतो आहे असा विचार मनात येत नाही तोच त्याचं स्पष्टीकरण आलं. “आता सध्या मी नाही तुझ्या  शाळेत. पण माझे मित्र येतात. त्यांची भारती दीदी म्हणजे माझी पण भारती दीदी ना ? तुझी शाळा नवीन इमारतीत आली की मी तिथे येणार आहे” 

त्याची आई पण म्हणाली,”दीदी हा विराज. रात्रंदिवस तुमच्या शाळेबद्दल बोलत असतो. तुमची नवीन शाळा आमच्या घराजवळच आहे. आमच्या सगळ्या नातेवाईकांना तो ही माझी नवीन शाळा आहे असं सांगतो.”

अंबरीषची पण तीच कहाणी. तो दुसऱ्या एका शाळेत पहिलीत शिकत होता. म्हणजे सहा-साडे सहा  वर्षांचा होता. एक दिवस संध्याकाळी  त्याची आजी त्याला घेऊन आली. “भारती,  हा तर अजिबात ऐकत नाहीय. तुझ्याच शाळेत येईन म्हणतोय. नाही पाठवलं तर आजार काढेल अशी भीती वाटते.”

“पण आजी, त्याची दोन वर्ष  वाया जातील. मी समजवते त्याला.” मी म्हणाले. 

“काही उपयोग नाही. ऐकणार नाही तो. त्याच्या आईवडलांनी पण मनाची तयारी केलीय.  तुझ्याच शाळेत येईल अंबरीष .” आपण इतर मुलांपेक्षा वयाने मोठे आहोत ही जाणीव अंबरीषला होती. सगळ्या मुलांशी तो मोठ्या भावासारखा वागायचा. सगळ्यांची काळजी घ्यायचा. 

सगळ्यात बहार आणली ती माझी सहायक शिक्षिका रुमी हिच्या गाण्याने. मुलांना ती वेगवेगळ्या भाषेतील बालगीतं शिकवायची. एखादी गोष्ट सांगायची असेल तरी त्यात गाणी असायची.नाटक असेल तरी त्यात गाणं असायचं. गोष्ट सांगायची किंवा नाटक बसवायची जबाबदारी माझी आणि गाणं रुमीचं. हार्मोनियम वर गाण्याची नुसती सुरावट जरी वाजवली तरी मुलांचं गाणं सुरू व्हायचं. 
 गोड आवाजाची पारिजात सैकिया रुमीकडे गाणं शिकायची. इतक्या लहान वयात तिने हार्मोनियम पण शिकायला सुरुवात केली होती. (याच पारिजातला नंतर भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाची आसामी लोकसंगीतासाठी शिष्यवृत्ती मिळाली.) 

                                                                       -------*****----------

शाळेच्या इमारतीचा पाया खणून झाला. रेती, विटा -  लोखंड  अशा एकेक गोष्टी साईटवर येऊ लागल्या. माझी वीट भट्टी आहे.  तुम्ही माझ्याकडून विटा घ्या. शाळेचं काम आहे मी स्वस्तात देईन असं वीट भट्टीचा मालक स्वत:हून मला 
म्हणाला. स्वस्तात मिळताहेत - पैसे वाचतील म्हणून मी देखील तयार झाले. जवळ जवळ दहा हजार वीट साईटवर पोचली. दुपारी मी तिथे पोचले तर सोना ने तक्रार केली. “दीदी, विटा खूपच कच्च्या आहेत. शाळेचं बांधकाम आहे . नंतर मला दोष देऊ नका. सोनाने सांगितलं तरीही मी आणखी चारसहा  जाणकरांना त्या विटा दाखवल्या. विटांच्या दर्जाबद्दल साऱ्यांचं  एकमत होतं. विटा अगदीच कच्च्या आहेत.  मी हिरालालला निरोप पाठवला. तो ताबडतोब आलाही. 

“हिरालाल, तू म्हणाला होतास की फर्स्ट ग्रेड वीट देईन. पण ही वीट तर सेकंड ग्रेड पण नाही. थर्ड ग्रेड आहे. कुणाला फसवतोस तू ? एक मुलगी आहे - हिला काय समजतं विटांमधलं ? आपला टाकाऊ माल हिला सहज खपवू शकतो असं वाटलं काय तुला ? मला याच्यातली एकही वीट नको. संध्याकाळच्या आत या सगळ्या विटा इथून गेल्या पाहिजेत. मला तुझं कोणतेही स्पष्टीकरण नकोय आता ह्या क्षणी तू इथून निघ..”  आयुष्यात आजवर इतक्या मोठ्याने कधी कुणाशी बोलले नव्हते - पहिल्यांदाच राग असा अनावर झाला होता. हृदयाची धडधड आणि श्वासाची गती वाढली होती.  हिरालाल काही न बोलता निघून गेला. संध्याकाळ पर्यन्त सगळ्या विटा कॅम्पसच्या बाहेर गेल्या होत्या. 
 
घरी पोचले तर दीप्ती गेटजवळ उभीच होती. म्हणाली,  ‘प्रार्थना करायची आहे ना ? मी केंव्हाची वाट बघतेय तुझी’. 
प्रार्थनेला सुरुवात झाली. प्रार्थना दीप्ती कडे होती. ती सत्य साईबाबांची भक्त होती.. समईच्या शांत मंद प्रकाशात प्रार्थना म्हणत असतांना हिरालाल, विटा, सोना - बांधकाम या साऱ्याचाच विसर पडला. प्रार्थने नंतर 
मी घरी परतले. आपण का चिडलो आज असं ? हा तर माझा स्वभाव नाही. स्वभावतला हा बदल चांगला की वाईट? 

सखी म्हणाली, “भारती, कधी कधी मुखवटा चढवणं पण गरजेचं असतं. जे केलंस आज ते छानच झालं. या पुढे हिरालाल देखील कुणाला फसवतांना दहा वेळा विचार करेल.” निश्चिंत मनाने मी झोपी गेले. 

दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजताच हिरालाल दारात हजर. केविलवाण्या  चेहऱ्याने मला म्हणाला, “दीदी, माझी खूप मोठी चूक झाली. मी पश्चातापाने रात्रभर झोपू शकलो नाही.  ही बातमी गोलाघाटमध्ये पसरली तर मला कोणी माफ करणार नाही. मला खरंच भीती वाटतेय. 

“मी फर्स्ट ग्रेडच्या दहा हजार विटा साईटवर आणून टाकतो. तुम्हाला हवे तेव्हढे पैसे द्या. पण नाही म्हणू नका. 
मला गोलाघाटमध्ये राहणं अशक्य होईल नाहीतर” 

माझ्या होकाराची वाट न पाहता तो निघाला. दुपारी बारा वाजेच्या आत साईटवर फर्स्ट ग्रेडच्या दहा हजार विटा येऊन पोचल्या होत्या. या घटनेवर मी तरी काय प्रतिक्रिया द्यावी ? मोठ्या अपेक्षेने मी सखीकडे पाहिलं. 

सखी म्हणाली, 

Pleasant experiences will make your life delightful but painful and bad experiences will lead you to growth. Always be the learner in the Life’s school. Don’t ever be the follower. 


भारती  ठाकूर
नर्मदालय,
लेपा  पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश
Email - narmadalaya@gmail.com

Website -
http://narmadalaya.org/
 
Facebook -
https://www.facebook.com/narmadalaya.ngo
 
Blog -
https://narmada-bharati.blogspot.com/

Comments

  1. तुमची चांगल्या अनुभवांची पोतडी कधीच रिती होऊ नये, ही प्रार्थना 🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मुलांची गृहभेट एक अविस्मरणीय अनुभव.....

मातृत्व