गोष्ट एका शाळेची (17)

गोष्ट एका शाळेची  (17)


शाळा सुटल्यावर जेवण करून मी जरा निवांत बसले होते.  जन्मभूमी  नावाचे आसामी भाषेतील स्थानिक  वर्तमानपत्र  मी तेव्हा विकत घेत असे. त्यातलं  फार काही कळत होतं असं नाही. पण  त्या निमित्ताने आसामी  भाषा  शिकता येईल असे वाटायचे.  रेडिओ पण विकत घेतला होता. त्यावर  दिब्रुगड आकाशवाणी  केंद्र लागायचे.  आसामी भाषा  ऐकायला गोड.  तोंडात  रसगुल्ला ठेवून  बोलत आहेत की काय असे वाटते. ‘स’ चा उच्चार ते ‘ह’ असा करतात. त्यामुळे ‘आता आपण सुगम संगीत ऐका.’  हे वाक्य ‘एतिया आपुनी हुगम हंगीत हुणीबो’ असं होतं. अशी काही मजेदार वाक्य  रेडिओवर  ऐकली की  मी स्वत:शीच खूप हसायचे. त्या दिवशी रेडिओवर गाणी ऐकत असताना डॉ बॅनर्जींचा  माळी जगदीश आला. “दीदी, साहबने आपको बुलाया है |”


असं काही  बोलावणं  आलं  की कशासाठी  हा प्रश्न न  विचारता सरळ  डॉक्टरांकडे पोहोचायचे हे धोरण मी ठरवले होते.  त्यांचे वय झाले आहे.  वय वाढले की काळजी आणि चिडचिड  भूमिती श्रेणीने  वाढतात हे मी अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत अनुभवले होते. आर्टिलरी सेंटर मध्ये आर्मीच्या लोकांबरोबर काम करताना आपल्यापेक्षा वरिष्ठांशी बोलताना ‘यस सर किंवा नो सर’ यापेक्षा  जास्त बोलू नये  हे देखील अनुभवाने शिकले  होते. आज डॉक्टर आपल्याला  काय सांगतील याचा अंदाज घेत घेत  मी त्यांच्या घरात प्रवेश केला.  कोणी  पाहुणे  त्यांच्याकडे आले होते. डॉक्टरांनी ओळख करून दिली. “ हे माझे मित्र भूपेन हजारिका. यांचे नाव  ऐकलं असशीलच.  फार मोठे गायक आहेत.  त्यांना आपल्या शाळेच्या बांधकामाबद्दल सांगितलं.  बांधकाम बघावं  अशी त्यांची इच्छा आहे. म्हणून तुला बोलावलं”. खरंतर बांधकाम  काही  दाखवण्याच्या  स्थितीतलं नव्हतं. पण पडत्या फळाची आज्ञा घेऊन  मी त्या पाहुण्यांना आणि डॉक्टर  बॅनर्जी यांना घेऊन साइटवर गेले. त्या पाहुण्यांनी देखील  ‘छान छान’ वगैरे  कौतुकाचे काही  शब्द ऐकवले. श्री भूपेन हजारिका हे माझ्यासाठी नाही  तर केवळ डॉक्टर बॅनर्जी यांच्यावरील  श्रद्धेपोटी  बांधकाम बघायला आले होते  हे मला ठाऊक  होते. कौतुकाच्या शब्दांपेक्षा  माझं लक्ष त्या परिसरात   नुकत्याच  उमलू लागलेल्या ऑर्किडस्  कडे जास्त होतं. कधी ऑर्किडस्  कडे तर कधी जवळच्याच पोखरी मध्ये  आम्ही सोडलेल्या  पांढऱ्या शुभ्र  बदकांच्या  जोडीकडे आणि  झाडावर बसून पाण्यातल्या छोट्या मासोळयांकडे नजर लाऊन बसलेल्या शबल खंडयाकडे माझं लक्ष सारखं सारखं जात होतं. कधी एकदाची आपली सुटका होते असं मला झालं.


औपचारिक वाक्यांच्या देवाण घेवाणी नंतर एकदाची सुटका झाली. घराचे कुलूप उघडत असतांनाच दीप्तीने तिच्या खिडकीतून विचारले, “ इतक्या दुपारी कुठे गेली होतीस ?” 


“डॉ  बॅनर्जींकडे कुणी भूपेन हजारीका नावाचे गायक आले होते. त्यांना बांधकाम पहायचे होते. म्हणून गेले होते” माझ्या या वाक्यावर ती जवळ जवळ किंचाळलीच, “काय भूपेन हजारिका ? ते गोलाघाट मध्ये आलेत ?  ते तर विश्व प्रसिद्ध गायक आहेत. ठाऊक आहे का तुला ?”


“असतील. पण मी  त्यांचं  नाव ऐकलं  नव्हतं” माझं अत्यंत थंड स्वरात उत्तर. 


काय वेडी मुलगी आहे. हिला भूपेन हजारिका पण माहीत नाहीत असा एक भाव तिच्या चेहऱ्यावर होता. मी तिला विचारलं, “तू जितेंद्र अभिषेकी  हे नाव ऐकलं आहेस ? ते पण विश्व प्रसिद्ध गायक आहेत.” तिने नाही म्हणताच मी तिला मलाही भूपेन हजारिका माहीत नाहीत. एवढं काय त्यात असं  उत्तर दिलं. (1993 साली रुदाली हा सिनेमा प्रसिद्ध झाल्यापासून भुपेन हजारिका या नावाची महती समजली.) आता वाटतं खरंच किती वेडेपणा केला मी.. 


एवढ्या मोठ्या गायकाचे काही अमूल्य क्षण  माझ्या आयुष्यात आले आणि मी  मात्र त्यावेळी  रोज दिसणाऱ्या बदकांकडेच  पाहत राहिले.

                                                              ----------xxxxxxxxxxxxx----------



शाळेला दोन तिन दिवस सलग सुट्टी होती. काझीरंगा या अभयारण्यात जाऊन यावे असा विचार करत होते. पण तेवढ्यात दिमापूर विवेकानंद केंद्राचा कार्यकर्ता मनोहर गाडी घेऊन आला. जोराहाटहून तो दिमापूरला परत चालला होता. दिमापूरला विवेकानंद केंद्राचे एक हॉस्पिटल आणि पाचवी पर्यंतची शाळा होती. तिथे नागपूरची  डॉ पूनम  कुलकर्णी आणि शिवसागरचे सेवानिवृत्त सिविल सर्जन डॉ बोरठाकूर हॉस्पिटलचे काम बघत. पूनमचे पती श्री मुकुंद कुलकर्णी यांच्याकडे शाळा आणि इतर व्यवस्थापनेची जबाबदारी होती. दिमापूरला  जाऊन हेल्थ चेकअप करता येईल ह्या विचाराने मनोहर बरोबर तिथे पोचले .कारण माझ्या  तापाची आवर्तनं काही संपत नव्हती.


संध्याकाळी डॉ बोरठाकूर यांच्या पत्नीशी गप्पा मारत असतांना ‘आओ’ जमातीची एक परिचित महिला तिथे आली.

दिमापूरच्या टेलिफोन एक्स्चेंज मध्ये ती नोकरी करायची.  1988 च्या उन्हाळ्यात मी दिमापूरला असतांना  तिला योग-प्राणायाम शिकवला होता. मला पाहताच ती आनंदाने गप्पा मारायला आली. माझा तिथे दोन दिवस मुक्काम आहे हे समजताच तिने मला जेवणासाठी आग्रहाचे आमंत्रण दिले. संध्याकाळी मी तुला घायला येईन आणि जेवणानंतर परत पोहोचवून पण देईन म्हणाली. नागामि लोकांच्या घरी पहिल्यांदाच जेवायला मिळणार - एक वेगळा अनुभव म्हणून मी पण खुश होते. तिच्या घरी पोचल्यावर हवापाण्याच्या गप्पा झाल्या. ताटं वाढायला ती उठली आणि म्हणाली, ‘भारती, तुला कुत्रा आवडतो ना ?” 


‘हो, आवडतो की !” हिला एकदम कुत्रा कुठून आठवला असा विचार माझ्या मनात येत नाही तोच ती म्हणाली,

“आज मी खास तुझ्यासाठी कुत्राच बनवला आहे. नॉन व्हेज खातेस ना?”


“कुत्रा ?” मी नखशिखांत थरथरायला लागले. “बाई गं, मी पूर्ण शाकाहारी आहे. कुत्रा प्रत्यक्षात काय स्वप्नात पण खाऊ शकणार नाही. मला माफ कर.”


“पण माझ्याकडे तर दुसरी काही भाजी नाहीये. आम्ही रोजच नॉन व्हेज खातो. आता तुला काय वाढू ?” माझी होस्ट काळजीत पडली. 

 

“तुझ्याकडे अमूल अथवा इतर कुठली दुधाची पावडर असेल ना ? मी दूध पोळी खाईन.” (त्या काळात तिकडे दूध असं सहजासहजी मिळत नव्हतं म्हणून लोक दुधाची पावडर वापरीत ). माझ्या डोक्याला आलेल्या झिंजिण्या कमी झाल्या नव्हत्या. सगळ्यांची ताटं वाढल्यावर तिचा नवरा त्या दोघांसाठी काचेच्या ग्लासात वाइन घेऊन आला. बहुधा त्यांच्यात दूधपोळी बरोबर वाइन घेत नसावेत म्हणून त्यांनी मला ऑफर केली नाही. तोंडात घास घेण्याआधी सवयी प्रमाणे मी हात जोडले आणि हा भोजन मंत्र खणखणीत आवाजात म्हटला.


ब्रह्मार्पणं ब्रह्महविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम्।


ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना।। 


त्या दोघांच्या ताटातील मृतात्म्याला श्रद्धांजली देत आणि   “ब्रह्मा तू भी क्या याद करेगा” असं म्हणत मी  जेवायला सुरुवात केली.



भारती  ठाकूर
नर्मदालय,
लेपा  पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश
Email - narmadalaya@gmail.com

Website -
http://narmadalaya.org/
 
Facebook -
https://www.facebook.com/narmadalaya.ngo
 
Blog -
https://narmada-bharati.blogspot.com/

Comments

  1. दोन हलक्या फुलक्या प्रसंगांनी थोडा रुचीपालट झाला ! 😊

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मुलांची गृहभेट एक अविस्मरणीय अनुभव.....

मातृत्व