गोष्ट एका शाळेची (१४)

गोष्ट एका शाळेची (१४)

आर्किटेक्ट राय बरूआ यांच्याकडून बांधकामाचा आराखडा देखील आला. पाया खोदण्याचे काम चालू करायचे तत्पूर्वी गोलाघाट नगरपालिकेची बांधकामासाठी परवानगी आवश्यक आहे म्हणून आर्किटेक्टचा आराखडा आणि एक अर्ज घेऊन मी नगरपालिकेत गेले. बांधकामासाठी परवानगी ज्या विभागात मिळते तिथल्या क्लार्कने विवेकानंद केंद्राच्या शाळेचा अर्ज बघताच तो दहा जणांशी चर्चा करायला गेला. मग मला म्हणाला, “हा अर्ज तुम्ही आधी नगराध्यक्षांना दाखवा. ते हो म्हणाले तरच आम्ही यावर काही कार्यवाही करू शकतो. नगराध्यक्ष डॉ लखी बरुआ खरं तर कार्यालयात होते. पण आता कामात आहे उद्या या असा त्यांनी निरोप दिला. सतत चार दिवस नगरपालिकेत जाऊन सुद्धा त्यांनी भेटायला नकार दिला. डॉ. बॅनर्जींना ही गोष्ट सांगितली तर ते मनापासून हसले. ते म्हणाले, “ नगराध्यक्ष तुला सहजासहजी भेटणार नाहीत आणि परवानगीही लवकर देणार नाहीत. कारण ते देखील गोलाघाटच्या एका शाळेचे विश्वस्त आहेत. आणि ती शाळा आपल्या शाळेच्या पलिकडेच आहे. आपण त्यांचे स्पर्धक होऊ अशी त्यांना भीती असावी”.
मी सरळ जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले. दोन कामं होती. एक म्हणजे सिमेंटचा परवाना (त्या काळात सिमेंट परवान्या खेरीज मिळत नसे) आणि दुसरं म्हणजे बांधकामासाठी नगरपालिकेची मंजूरी. ५०० गोणी सिमेंट तर तत्काळ मंजूर झालं. बांधकामाच्या मंजूरी बद्दल जिल्हाधिकारी श्री त्रिवेदी म्हणाले, तुम्ही काम सुरू करा. मी स्वत:हून त्यांना फोन करत नाही. ते भेटले की माझ्या पद्धतीने हे काम करवून घेईन. काळजी करू नका” (सिमेंटची मंजूरी मिळाली तरी परवाना हातात यायला पुरवठा विभागात दहा चकरा माराव्याच लागल्या.) जिल्हाधिकारी कार्यालयातून पुन्हा सोनाला काम सुरू कर हे सांगायला गेले. तो देखील आनंदला. दिवस वाया जायला नकोत. पाया खोदायला सुरवात करतो म्हणाला. आजची रात्र निश्चिंत मनाने झोपता येईल म्हणून मी पण सुटकेचा निश्वास टाकला. संध्याकाळी सोनाने बांधकामाच्या जागेवर किती काम केलंय ते पहायला गेले तर सोना व त्याचे गवंडी काम संपवून जवळच्याच पुखरीत हातपाय धुवायला गेले होते. एवढ्यात प्रवेशद्वाराजवळ मोटरसायकल थांबल्याचा आवाज आला. शाळा सुरू करते आहे म्हणून मला धमकावणारा तो मुलगा गेटमधून आत येत होता. हा एकदा बाजारात भेटला होता. थांबून त्याने शाळेची विचारपूस पण केली होती. त्याच्या बोलण्यावरून तो चांगला शिकला सवरलेला वाटतो. का भरकटतात ही मुलं अशी? यांना योग्य दिशा दाखवणारं कुणीच नाही का? कधी तरी त्याच्याशी या विषयावर बोलायला हवं. पण आज हा इथे का आलाय? त्याच्या देहबोली वरुन स्वारी आज मूडमध्ये दिसत नाहीय. "ये. काय विशेष?' माझा सरळ विषयालाच हात घालणारा प्रश्न. "बांधकामाला सुरुवात करताय वाटतं?' त्याने विचारलं. त्याच्या मनात काय आहे याचा मला अंदाज आला. आता त्याला खरं सांगायलाच हवं. बांधकाम काय लपवून थोडंच करता येणार आहे? "हो. पूर्व प्राथमिक वर्गातली मुलं आता पुढच्या वर्गात जातील. त्यांना बसायला वर्ग हवा ना." मी त्याच्याकडे पहात उत्तरले.
"शाळेचं बांधकाम करायचा तुमचा अट्टहास का? बालवाडी चालवता तेवढं पुरं नाही?" तो चिडून बोलत होता.
“डॉ. रॉबिन बॅनर्जीनी ही जागा विवेकानंद केंद्राला दान केली आहे हे तुम्हाला आणि सगळ्या गोलाघाटला ठाऊक आहे. त्या जागेवर शाळा बांधली जावी हे देखील डॉ.बॅनर्जीच्याच इच्छेनुसार ठरलं आहे. त्यामुळे इथे माझ्या अट्टहासाचा प्रश्नच येत नाही. त्यांची इच्छा पूर्णत्वाला जाईल यासाठी मी केवळ एक माध्यम आहे. मला वाटतं, त्याच त्या विषयावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही." ''माझ्या संघटनेतल्या लोकांना हे समजावून सांगायचा मी प्रयत्न केलाय. पण त्यांना ते मंजूर नाही. गोलाघाट मधली जमीन कन्याकुमारीच्या संस्थेला का दान दिली या एकाच मुद्यावर ते अडून बसलेत. मला वाटतं तुम्ही हा अट्टहास सोडावा. नाहीतर कदाचित तुमच्या जीवालाही धोका संभवतो." त्याच्या स्वरात थोडी धमकी, थोडी काळजी. 'दोन-तीन मिनिट अस्वस्थ शांततेत गेली.
“एका मुलीला धमकावण्यात कसला आलाय पुरुषार्थ? मला तुमचा विरोध नकोय, सहकार्य हवंय. ते सहकार्य तुमच्याकडनं मला मिळेल असा मला विश्वास वाटतो. माझा विश्वास अनाठायी ठरवू नका ." "माझ्या संघटनेतल्या सहकाऱ्यांना हे पटवणं कठीण आहे. पण मी प्रयत्न करीन. निघतो मी. तुम्ही पण लवकर घरी जा. अंधार पडल्यावर गोलाघाटमध्ये एकटयाने फिरत जाऊ नका." एका परक्या गावात कुणाला तरी आपली काळजी वाटते ही भावनाच मोठी सुखावह होती. आमचं हे बोलणं चालू असतांना नेमका डॉक्टर बॅनर्जींचा ड्रायव्हर जमाल तिथे सोनाने दिवसभरात पाया किती खोदला हे पहायला आला होता. माझ्याशी कोण आणि काय बोलत आहे हे तो उत्सुकतेने ऐकत होता. जितकी भीती मला त्या मुलांची वाटली नाही त्याहून अधिक भीती ड्रायव्हर जमालची वाटली. हा आता रॉबिनदांकडे काहीतरी जाऊन बरळणार हे नक्की. ------------------------- सिमेंटचा परवाना तर मिळाला. मला वाटलं आता दुकानात जाऊन सिमेंट घेऊन यायचं. पृथानि हार्डवेअरचा मालक माझ्या चांगल्या ओळखीचा होता. त्यांच्याकडे तो परवाना घेऊन गेले तर ते म्हणाले, आता तुम्हाला बोकाजान येथील सीमेंट फॅक्टरीमध्ये जाऊन तिथे पैसे भरावे लागतील आणि तिथून सिमेंट आणावे लागेल. त्यासाठी ट्रक घेऊन जावा लागेल. ते ऐकल्यावर हसावं की रडावं ते समजेना. अशावेळी रिचर्ड बाखने तरी गप्प बसावं ना ? तो म्हणाला, Every person All the events of your life are there because you have drawn them there What you choose to do with them is upto you. आमच्या शाळेत मनदीप सिंग नावाचा एक सरदारजी मुलगा होता. त्याच्या वडलांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. त्यांना माझी अडचण सांगितली. तर म्हणाले, दीदी, तुम्ही काळजी करू नका. मी खात्रीचा ड्रायव्हर देतो. ०३ फेब्रुवारी १९८९ रोजी सकाळी आठ वाजताच आम्ही निघालो. ट्रकमध्ये तर आजपर्यंत कधी बसलेच नव्हते. आज ड्रायव्हरच्या केबिनमध्ये बसून प्रवासाची संधी मिळाली. गोलाघाट जिल्ह्याची सीमा संपल्यावर करबी अँगलॉन्ग हा जिल्हा सुरू होतो. तिथेच आमची ट्रक काही तरुणांनी थांबवली. आज ‘करबी अँगलॉन्ग बंद’ आहे. तुम्हाला पुढे जाता येणार नाही. मला फक्त बोकाजान पर्यंतच जायचं आहे असं म्हणत मी त्यांची आर्जवं केली. मला बोकाजान पर्यन्त जायची परवानगी तर मिळाली पण संध्याकाळी पाच वाजे पर्यन्त तुम्ही तिथून निघू नका. कारण रस्त्यात इतरांनी गाडी अडवली तर ती जबाबदारी आमच्यावर नाही. एकदाचे बोकाजान गावात पोचलो आम्ही. सिमेंट फॅक्टरी मधून निघणाऱ्या धुराळ्यामुळे या गावातल्या सगळ्या झाडांच्या पानांवर सिमेंटचा थर जमला होता. तीच अवस्था घरांची. इथली ७० टक्के जनता अस्थमा किंवा फुफ्फुसांच्या इतर आजारांनी त्रस्त असते. पर्यावरणाचा विचार करणारी मीच इथे सिमेंट घ्यायला आले होते. या विरोधाभासाला काय म्हणायचं ? ट्रक ड्रायव्हरने मला विचारलं, “दीदी, असंही आपल्याला संध्याकाळी पाच वाजेच्या आत निघता येणार नाहीये. माझे नातेवाईक इथे राहतात. मी त्यांच्याकडे जाऊन दुपारी दोन पर्यन्त येतो.” मी देखील बावळटा सारखी त्याला परवानगी दिली. तेंव्हा फक्त साडे दहा वाजले होते. त्याचा पत्ताही मी विचारला नाही आणि फोनही नाही. सिमेंट फॅक्टरीमध्ये जाऊन पैसे भरायला गेले तर मला विचारण्यात आलं, “तुमच्याबरोबर कुणी पुरुष माणूस नाही आलं ?” “त्यांनी काय फरक पडला असता ? पैसे तर मी पूर्ण भरलेत. ट्रक पण घेऊन आलेय.” मी. “गोडाऊन मध्ये जाऊन गोण्या मोजाव्या लागतात तिथे आम्ही बायकांना पाठवू शकत नाही.दुपारी एक वाजेपर्यंत तुम्हाला गोण्या ताब्यात घ्याव्या लागतील ” तिथल्या कर्मचाऱ्याने मला अत्यंत उर्मटपणाने उत्तर दिले. स्त्रीचा जन्म मिळाल्याबद्दल पहिल्यांदाच वाईट वाटलं. कारण त्या कर्मचाऱ्यांशी वाद घालण्याइतके त्राण उरले नव्हते. भर उन्हात खटखटीच्या फाट्यावरचा एक काका परिचित होता तिथपर्यंत जाणं भाग होतं. अंतर फक्त ९ कि. मी. मनातल्या मनात ते भेटू देत म्हणून प्रार्थना करत होते. सुदैवाने ते भेटले. त्यांच्या बरोबर सायकलवर मागे बसून बोकाजान येथे परतले. गोण्या मोजून झाल्या आणि नंतर ट्रक ड्रायव्हर पान खात खात संथपणे पोहोचला. हमालांनी गोण्या ट्रकमध्ये भरल्या. खटखटीच्या काकांना धन्यवाद देऊन निरोप दिला आणि हुशः करत ट्रक मध्ये बसले. दहा पंधरा मिनिटात जाणवलं की अंग गरम होतंय. सणकून ताप चढला होता. दुपारचं जेवणही विसरले होते. वाटेत एका टपरीवर चहा घेतला आणि गोलाघाटला पोचले. सोनाला ट्रक रिकामा करून घ्यायला सांगितला. घरी जाऊन क्रोसिनची गोळी घेतली आणि अंथरुणावर आडवी झाले. वाटलं, बस्स ! संपलं सारं. देवा, ने मला आता. तेवढ्यात रिचर्ड बाख म्हणाला - What the caterpillar calls the end of the world, the master calls it a butterfly. भारती ठाकूर नर्मदालय, लेपा पुनर्वास (बैरागढ) जिल्हा खरगोन मध्य प्रदेश Email - narmadalaya@gmail.com Website - http://narmadalaya.org/ Facebook - https://www.facebook.com/narmadalaya.ngo Blog - https://narmada-bharati.blogspot.com/

Comments

  1. दीदी ,
    तुम्ही प्रवाहात झोकून तर दिलं आहेच. तेव्हा आता हातपाय मारण्याशिवाय गत्यंतरच नाही. बाख, स्वामी विवेकानंद, डॉ. बॅनर्जी आणि तुकोबा आहेतच तुम्हाला बळ द्यायला !
    शिवाय अगणित परिचितांच्या शुभेच्छा !

    ReplyDelete
  2. इतकं धाडसाने, पोटतिडिकीने आणि उत्कटपणे जगायला आणि मग ते माफकच पण 'बाखी' अलंकारांनी नटवून कागदावर उतरवायला मन असामान्य मुशीतून घडलेलं असावं लागतं.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद डॉ उज्ज्वला. तुमची ही 'बाखी' अलंकाराची कल्पना खूप आवडली.

      Delete
  3. इतके धाडसाने, पोटतिडिकीने आणि उत्कटपणे जगायला आणि मग ते माफकच पण 'बाखी' अलंकारांनी नटवून कागदावर उतरवायला मन असामान्य मुशीतून घडलेलं असावं लागतं. 🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मुलांची गृहभेट एक अविस्मरणीय अनुभव.....

मातृत्व