गोष्ट एका शाळेची (23)
गोष्ट एका शाळेची (23)
दुसऱ्या दिवशी ‘आसाम बंद’ असूनही आमची शाळा चालू होती. मुलांची उपस्थिती देखील चांगली होती. गाणी, खेळ आणि गोष्ट झाल्यावर मुलं डबा खायला बसली. इतक्यात रेणूबायने मला कोणी तरी भेटायला आलं आहे असं सांगितलं. पडवीत तो माणूस उभा होता. पावसामुळे टोपी आणि रेनकोट त्याच्या अंगावर होता.अर्धा चेहरा टोपीने झाकला होता. मी त्याला ओळखलं नाही हे त्याच्या लक्षात आलं असावं. त्याने डोक्यावरची टोपी बाजूला केली. शाळा सुरू करण्या आधी आणि शाळेच्या इमारतीचं बांधकाम सुरू केलं तेंव्हा मला समज cum धमकी द्यायला आलेला हाच मुलगा होता. क्षणभर टेंशन वाढलंच माझं.
त्यानी काही बोलायच्या आतच मी आदल्या दिवशी संध्याकाळी आलेल्या माणसाला जे उत्तर दिलं तीच कॅसेट याच्याही समोर वाजवली. तो मिश्किल हसला. “मी कुठे काय म्हणतोय ? सहजच या रस्त्याने जात होतो. तुमची शाळा आज चालू आहे हे ठाऊक आहे मला. Don’t worry. एकूण किती विद्यार्थी आहेत आपल्या शाळेत ? ”
“अठ्ठावीस”. त्याच्या ‘आपल्या शाळेत’ या शब्दांची मला गंमत वाटली.
“चांगले रिपोर्टस् आहेत गावातल्या लोकांचे या तुमच्या शाळेबद्दल. तुमच्या बांधकामावर पण मी अधून मधून चक्कर टाकतो. सोना चांगलं काम करतोय.” मी अवाक् होऊन पहात राहिले. सोना मला याबद्दल कधी बोलला नव्हता.
“गैरसमज करून घेऊ नका. मी अगदी सहजच जातो तिथे.” माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह पाहून तो म्हणाला.
“तुम्ही कोण आहात आणि तुमचं नाव काय ?” माझ्या मनात थोड्या शंका- थोडी भीती.
“कोण आहे ? एक माणूस आहे - बस्स. मला DC या नावाने ओळखतात. येतो मी. तुमचा वेळ घेत नाही”. मी काही म्हणायच्या आत तो पायऱ्या उतरून गेलाही.
दुपारी मुसळधार पावसामुळे साईटवर जाता आलं नाही. प्रयत्न करूनही त्या मुलाचे विचार मनातून जात नव्हते. नेमकं काय असेल याच्या मनात ? इमारत तयार झाल्यावर तर हे लोक काही त्रास देणार नाहीत ? आपलंच मन वैरी असतं हेच खरं.
“ठाकुर, माझे कष्ट वाया जाऊ देऊ नका. माझ्या शाळेतील या चिमुरड्या बाळगोपाळांचे भविष्य आता तुमच्या हातात आहे” मी हात जोडून प्रार्थना केली. फार सोपं असतं ठाकुरांवर जबाबदारी सोपवणं.
मन कशात तरी गुंतवायचं म्हणून मी बांधकामाचे हिशोब लिहायला घेतले. कन्याकुमारीला वेळेत पाठवायला हवेत. त्यात बराच वेळ गेला. संध्याकाळचे पाच वाजले. मी चहा केला. भजी खाण्याचा मूड आला म्हणून भजी पण बनवली. भज्यांची प्लेट आणि चहाचा कप घेऊन पडवीत आले. पाऊस थांबून आता लख्ख पण कोवळं ऊन पडलं. महाराष्ट्रात फेब्रुवारी - मार्च महिन्यात असा इतका पाऊस कधी पडत नाही. पण हे आसाम राज्य आहे - पाऊस बेभरवशाचा असतो. समोरच्या ताम्हण वृक्षाच्या फुलांचा रस्त्यावर सडा पडला होता. त्यावर चालणारे लोक कुणी त्यांना पायदळी तुडवत होते तर एकदोन रसिकांनी काही ताजी फुलं हातात उचलली देखील. अनेक सायकल रिक्षा, गाड्या त्या फुलांचा चुराडा करत जात होत्या. क्षणभर वाटलं - त्या फुलांच्या ठिकाणी आपणच आहोत. कुणी अपमान करावा- कुणी स्तुती करावी. अचानक पक्ष्यांच्या आवाजाने लक्ष आकाशाकडे गेलं आणि नखशिखांत मोहरून आले. आकाशात इन्द्रधनुष्य सात रंगांची उधळण करत होतं.
माझं मन उदास असलं की ‘ठाकूर’ आणि 'माँ ' शब्दांनी कधी समजावत नाहीत. कृती करतात. ते इन्द्रधनुष्य फक्त माझ्याच साठी होतं.
सखी काही बोलली नाही. तिने केवळ माझ्या पाठीवरनं हात फिरवला आणि माझ्या शेजारी बराच वेळ बसून राहिली. शब्दांपेक्षा तिचं मौन बरंच काही सांगून जातं.
भारती ठाकूर
नर्मदालय,
लेपा पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश
Email - narmadalaya@gmail.com
Website -
http://narmadalaya.org/
Facebook -
https://www.facebook.com/narmadalaya.ngo
Blog -
https://narmada-bharati.blogspot.com/
ठाकुर तुमची प्रार्थना ऐकणारच ! 🙏
ReplyDelete'आपली' शाळा हेही इंद्रधनुष्यच ना!
ReplyDelete